बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

शरद तळवलकर आता आठवण उरलीय





शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलीटरी अकौंटस्’ मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.

विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला.

पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ आणि ‘सखी शेजारीण’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.

अतिशय बोलक्या चेह-याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.

नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’ ‘अखेर जमलं’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘बायको माहेरी जाते’, ‘मुंबईचा जावई’ आणि ‘एकटी’ अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. ‘जावई विकत घेणे’ मधील म्हाता-याच्या भूमिकेचे आणि ‘एकटी’तील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा